Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उपदेशक 10-12

10 थोड्या मेलेल्या माशा सगळ्यांत चांगल्या अत्तरालासुध्दा वाईट वास आणतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.

विद्वान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात. मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा् दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.

तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाही [a] दुरुस्त करू शकाल.

मी आयुष्यात जे काही पाहिले त्यात ही एक गोष्ट आहे आणि ती योग्य नाही. राजे लोक करतात तशी ती एक चूक आहे. मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात. जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोड्यावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.

प्रत्येक कामात संकटे असतात.

जो माणूस खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात पडू शकतो. जो माणूस भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता असते. जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.

10 पण शहाणपण कुठलेही काम सोपे करते. धार नसलेल्या सुरीने कापणे कठीण असते. पण एखाद्याने जर सुरीला धार लावली तर कापणे सोपे जाते. शहाणपण तसेच आहे.

11 एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.

12 विद्वान माणसाचे शब्द स्तुतीला पात्र ठरतात.
    पण मूर्खाचे शब्द त्याचा नाश ओढवतात.

13 मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेड्यासारख्या गोष्टी सांगायला लागतो. 14 मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.

15 मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून
    त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.

कामाचे महत्व

16 राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते. 17 पण राजा जर चांगल्या घराण्यातून [b] आलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.

18 जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल
    तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.

19 लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.

अफवा

20 राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.

संकटांचा सामना दृढतेने करा

11 जिथे जिथे जाल तिथे तुम्ही चांगल्या गोष्टी करा. [c] तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी कराल त्या तुमच्याकडे परत येतील.

तुमच्याकडे जे काही आहे त्याची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा [d] पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हाला कल्पना नसते.

तुम्ही पुढील गोष्टींबद्दल खात्री बाळगा. जर ढग पाण्याने भरलेले असतील तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. झाड जर उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जिथे पडते तिथेच राहते.

पण काही गोष्टींविषयी तुम्हाला खात्री नसते. त्याबाबतीत तुम्हाला संधी शोधावी लागते. जर एखादा माणूस चांगल्या हवामानाची वाट बघत बसला तर तो कधीच पेरणी करू शकणार नाही. आणि जर एखादा माणूस प्रत्येक ढगाकडून पाऊस पाडण्याची अपेक्षा करू लगला तर त्याला आपले पीक कधीच घेता येणार नाही.

वाऱ्याची दिशा तुम्हाला माहीत नसते. आणि आईच्या शरीरात तिचे बाळ कसे वाढते ते आपल्याला माहीत नसते. त्याच प्रमाणे देव काय करील तेही तुम्हाला माहीत नसते. सर्व गोष्टी तोच घडवून आणतो.

म्हणून अगदी पहाटेलाच पेरणीला सुरुवात करा आणि संध्याकाळपर्यंत थांबू नका. का? कारण कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवेल हे तुम्हाला माहीत नसते. कदाचित तुम्ही जे जे काही कराल ते ते यशस्वी होईल.

जिवंत असणे चांगले असते. सुर्याचा प्रकाश पहाणे छान असते. तुम्ही कितीही जगलात तरी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक दिवस उपभोगला पाहिजे. पण तुम्ही मरणार आहात याची आठवण ठेवा. तुम्ही जिवंत असाल त्यापेक्षा अधिक काळ मेलेले असाल. आणि मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.

तुम्ही तरुण आहात तो पर्यंत देवाची सेवा करा

तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा. 10 रागाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि शरीराला पाप करायला प्रवृत्त करू नका. [e] आयुष्याच्या पहाटे तरुण असताना लोक मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात.

वृध्दत्वाचे प्रश्न

12 तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले” [f] असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.

सूर्य, चंद्र आणि तारे तुमच्या नजरेला दिसणार नाहीत अशी वेळ येण्याआधी. तरुणपणीच आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा. संकटे तर पाठोपाठ येणाऱ्या वादळाप्रमाणे पुन्हा पुन्हा येत राहतात.

त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत. तुम्हाला नीट ऐकूही येणार नाही. तुम्हाला रस्त्यावरचा गोंधळ ऐकू येणार नाही. धान्य दळताना येणारा जात्याचा आवाज देखील तुम्हाला शांत वाटेल. बायकांची गाणी तुम्ही ऐकू शकणार नाही. पण साध्या पक्ष्याच्या गाण्याचा आवाजसुध्दा् तुम्हाला सकाळी जाग आणील. कारण तुम्ही झोपू शकणार नाहीत.

तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वतःला ओढाल. तुमची जगण्याची इच्छा [g] नाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोक [h] अत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.

मृत्यू

तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा.
    चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी,
तळाशी फुटलेल्या काचेच्या भांड्यासारखे
    तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी,
विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे
    तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
तुमचे शरीर मातीपासून निर्माण झाले
    आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचे शरीर परत मातीला मिळेल.
पण तुमचा आत्मा देवाकडून आला
    आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचा आत्मा परत देवाकडे जाईल.

सगळ्या गोष्टी इतक्या निरर्थक आहेत. गुरू म्हणतात की हे सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.

सारांश

गूरू अतिशय शहाणे होते. त्यांनी त्यांचे शहाणपण लोकांना शिकवायला वापरले. गुरूंनी शहाणपणाच्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांची नीट रचना केली. [i] 10 त्यांनी योग्य शब्द शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी खऱ्या आणि विसंबण्याजोग्या शिकवणुकी लिहिल्या.

11 विद्वान माणसाचे शब्द हे प्राण्यांना योग्य मार्गाने नेणाऱ्या चाबकासारखे असतात. ती शिकवण न तुटणाऱ्या खुंट्यासारखी असते. तुम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखविण्यासाठी तुम्ही त्या शिकवणुकीवर विश्वास ठेवू शकता. शहाणपणाच्या त्या सर्व गोष्टी त्या एकाच मेंढपाळाकडून (देवाकडून)येतात. 12 म्हणून मुला. त्या शिकवणुकींचा अभ्यास कर पण इतर पुस्तकांविषयी सावध रहा. लोक नेहमी पुस्तके लिहीत असतात. आणि खूप अभ्यास तुम्हाला कंटाळा आणेल.

13-14 आता या पुस्तकांत [j] लिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का? कारण देवाला लोक करतात त्या सर्व गुप्त गोष्टी सुध्दा माहीत असतात. त्याला सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टीं विषयी माहिती असते. लोकांनी केलेल्या गोष्टींचा तो न्यायनिवाडा करील.

गलतीकरांस 1

प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते. देव जो पिता त्याने व येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले. हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडूनही आहे.

आणि हे गलतीया [a] येथील मंडळ्यांना (विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.

यांची कृपा चांगुलपण व शांति तुम्हाबरोबर असो. येशूने स्वतःला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्ही राहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती. त्याला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

फक्त एकच सुवार्ता खरी आहे

मला आश्चर्य वाटते की ज्या देवाने तुम्हांला ख्रिस्ताद्वारे बोलाविले आहे त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर दुसऱ्या सुवार्तेकडे वळत आहात. ती खरी सुवार्ता नाही पण असे काही जण आहेत की ते तुम्हांला गोंधळात टाकीत आहेत व ख्रिस्ताविषयीची सुवार्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो. आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आता पुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हांस सांगत असेल तर देव त्याला शाप देवो.

10 आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करीत आहे काय? मी मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो.

पौलाचा अधिकार देवाकडून आहे

11 बंधूनो, तुम्हांला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तो मानवी संदेश नाही. 12 कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली.

13 यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळ केला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला. 14 माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.

15 त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला बोलावले. 16 आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की, विदेशी लोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही. 17 किंवा जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.

18 मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो. 19 परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल. 20 आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे, ते खोटे नाही. 21 नंतर मी सूरीया व किलीकिया प्रांतांत गेलो.

22 परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो. 23 त्यांनी फक्त ऐकले होते. लोक म्हणतातः “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला, ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचा प्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.” 24 आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center