Old/New Testament
शहाणपणाच्या शिकवणुकींचा संग्रह
7 चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते.
ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
2 प्रेतयात्रेला जाणे हे एखाद्या समारंभाला जाण्यापेक्षा चांगले असते. का?
कारण सगळ्या माणसांना मरणे भाग असते
आणि प्रत्येक जिवंत माणसाने हे मान्य करायला हवे.
3 दु:ख हे हास्यापेक्षा चांगले असते. का?
कारण जेव्हा आपला चेहरा दु:खी असतो तेव्हा आपले हृदय चांगले होते.
4 शहाणा माणूस मरणाचा विचार करतो
पण मूर्ख माणूस फक्त वेळ चांगला जाण्याचाच विचार करतो.
5 शहाण्या माणसाकडून टीका होणे
हे मूर्खाकडून स्तुती होण्यापेक्षा चांगले असते.
6 मूर्खाच्या हास्याची काहीच किंमत नसते.
ते भांडे गरम करण्यासाठी काट्यांचा जाळ करण्यासारखे आहे.
काटे लवकर जळून जातात
आणि भांडे मात्र गरम होत नाही.
7 एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा्
त्याचे शहाणपण विसरुन जाईल.
तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.
8 कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापेक्षा एखादी
गोष्ट संपवणे अधिक चांगले असते.
सहनशील आणि प्रेमळ असणे हे गर्विष्ठ
आणि अधीर असण्यापेक्षा चांगले असते.
9 चटकन राग येऊ देऊ नका. का?
कारण रागावणे हा मूर्खपणा आहे.
10 “पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका.
“काय झाले?”
शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.
11 जर तुमच्याजवळ मालमत्ता असेल तर तिच्या जोडीला शहाणपण असणे अधिक चांगले. शहाण्या लोकांना [a] खरोखरच जास्त संपत्ती मिळते. 12 शहाणपण व पैसा संरक्षण करू शकतो. तथापि शहाणपणाने मिळविलेले ज्ञान अधिक चांगले असते कारण ते जीवन वाचविते.
13 देवाने केलेल्या गोष्टी पाहा. एखादी गोष्ट चुकीची आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही ती बदलू शकत नाही. 14 जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.
लोक खरोखर चांगले नसू शकतात
15 माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सगळे काही पाहिले आहे. चांगली माणसे तरुणपणीच मेलेली मी पाहिली आहेत. आणि वाईट माणसे खूप वर्षे जगलेली मी पाहिली आहेत. 16-17 म्हणून स्वतःला का मारायचे? खूप चांगले किवा खूप वाईट होऊ नका. आणि खूप शहाणे किंवा खूप मूर्खही होऊ नका. तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
18 यांतले थोडे आणि त्यातले थोडे असे व्हायचा प्रयत्न करा. देवाचे भक्त सुध्दा काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी करतात. 19-20 या पृथ्वीवर सदैव चांगल्या गोष्टी करणारा आणि कधीही पाप न करणारा असा माणूस नाही. शहाणपण माणसाला शक्ती देते. एक शहाणा माणूस दहा मूर्ख नेत्यांपेक्षा अधिक बलवान असतो.
21 लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल. 22 आणि तुम्ही सुध्दा इतरांविषयी बरेचदा वाईट बोललेले आहा हे तुम्हाला माहीत आहे.
23 मी माझे शहाणपण वापरून या गोष्टींचा विचार केला. मला खरोखरच शहाणे व्हायचे होते. पण ते अशक्य होते. 24 गोष्टी अशा का आहेत ते मला खरोखरच कळत नाही. हे कोणालाही कळणे फार कठीण आहे. 25 मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो?
मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे. 26 मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापळ्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखळ्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
27-28 गुरू म्हणतात, “मी सगळचा गोष्टी एकत्र केल्या कारण त्यांचे उत्तर काय येते ते मला पहायचे होते. मी अजूनही उत्तर शोधत आहे. परंतु मला हे मात्र मिळाले. मला हजारात एक चांगला माणूस मिळाला. पण मला एकही चांगली स्त्री मिळाली नाही.
29 “मी आणखी एक गोष्ट शिकलो. देवाने माणसाला चांगले बनवले. पण माणसांनीच वाईट होण्याचे अनेक मार्ग शोधून काढले.”
शहाणपण आणि सत्ता
8 शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो.
2 तुम्ही नेहमी राजाची आज्ञा पाळली पाहिजे असे मी म्हणतो. तुम्ही हे करा कारण देवाला तुम्ही तसे वचन दिले. आहे. 3 राजाला काही गोष्टी सुचवताना भीती बाळगू नका आणि चुकीच्या गोष्टी करायला मदतही करू नका. पण राजा त्याला (स्वतःला) आनंद देणाऱ्याच आज्ञा देतो हे लक्षात ठेवा. 4 राजाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. आणि काय करायचे हे त्याला कोणीही सांगू शकत नाही. 5 जो माणूस राजाच्या आज्ञा पाळतो तो माणूस सुरक्षित राहातो. शहाण्या माणसाला हे करायची योग्य वेळ माहीत असते आणि योग्य गोष्टी केव्हा करायच्या हे ही त्याला माहीत असतात.
6 माणसाकडे सगळ्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग असतो. आणि प्रत्येकाने संधीनुसार काय करायचे ते ठरवायचे असते. तो अनेक संकटांत असला तरी त्याने या गोष्टी केल्या पाहिजेत. 7 कारण काय घडेल या बद्दल त्याला खात्री नसते. का? कारण भविष्यात काय होईल ते त्याला कुणीही सांगू शकत नाही.
8 आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वतःचे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.
9 मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. या जगात घडणाऱ्या गोष्टी विषयी मी खूप विचार केला. लोक नेहमी दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्यांच्यासाठी वाईट आहे.
10 दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडले. हे फारच अविचारी आहे.
न्याय, बक्षिसे आणि शिक्षा
11 लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते.
12 पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरी ही त्याला भरपूर आयुष्य मिळेल. असे असले तरी देवाची आज्ञा पाळणे आणि त्याला मान देणे हे अधिक चांगले असते. 13 दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल.
14 पृथ्वीवर घडणारी आणखी एक गोष्ट अशी आहे जी योग्य वाटत नाही. वाईट गोष्टी वाईट माणसांच्या बाबतीत घडाव्या आणि चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांच्या बाबतीत. पण कधी कधी चांगल्या माणसांचे वाईट होते आणि वाईट माणसांचे चांगले हे योग्य नाही. 15 म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.
देव जे काही करतो ते सर्व आपल्याला कळत नाही
16 लोक या आयुष्यात जे करतात त्याचा मी नीट अभ्यास केला. लोक किती व्यग्र होते ते मी पाहिले. ते रात्रंदिवस काम करतात. ते जवळ जवळ कधीच झोपत नाहीत. 17 देव ज्या असंख्य गोष्टी करतो त्याही मी पाहिल्या आणि देव पृथ्वीवर ज्या गोष्टी करतो त्या लोकांना कळणे शक्य नसते. एखादा माणूस ते समजून घेण्याचा प्रयत्न करील पण त्याला ते अशक्य आहे. एखाद्या विद्वान माणसाने जरी असे म्हटले की त्याला देवाचे काम समजते. तरी ते खरे नसते. त्या सर्व गोष्टी कळणे कोणालाही शक्य नाही.
मृत्यू न्याय्य आहे का?
9 मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. चांगल्या आणि शहाण्या माणसांचे काय होते आणि त्यांनी काय करावे हे सर्व देवाच्या हातात असते. आपला तिरस्कार केला जाईल की आपल्यावर प्रेम केले जाईल याबद्दल लोकांना काहीही माहीत नसते. आणि भविष्यात काय होणार या बद्दल ही त्यांना काही माहीत नसते.
2 पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या बाबतीत घडते ती म्हणजे आपण सर्व मरतो. मरण वाईट माणसांना आणि चांगल्या माणसांनाही येते. जी माणसे शुध्द आहेत त्यांनाही मरण येते आणि जी शुध्द नाहीत त्यांनाही येते. जे लोक यज्ञ करतात त्यांनाही मरण येते आणि जे यज्ञ करत नाहीत त्यांनाही मरण येते. चांगला माणूस पापी माणसासारखाच मरेल. जो माणूस देवाला काही खास वचने देतो, जो अशी वचने द्यायला घाबरतो तो त्या माणसासारखाच मरेल.
3 या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात. 4 जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. तो कोण आहे याला महत्व नाही. पण हे म्हणणे खरे आहे:
“जिवंत कुत्रा मेलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.”
5 जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात. 6 माणूस मेल्यानंतर त्याचे प्रेम. त्याचा द्वेष, मत्सर हे सर्व जाते. आणि मेलेला माणूस पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीत कधीच भाग घेणार नाही.
जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या
7 तेव्हा आता जा, तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा. द्राक्षारस (मद्य) प्या आणि आनंदी व्हा. तुम्ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल. 8 चांगले कपडे घाला आणि चांगले दिसा. 9 प्रेम असलेल्या पत्नीबरोबर आयुष्य आनंदात घालवा. तुमच्या छोट्याशा आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा. देवाने तुम्हाला पृथ्वीवर छोटे आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच तुमच्याकडे आहे हे जाणून या आयुष्यात तुम्हाला जे काम करायचे आहे त्याचा आनंद लुटा. 10 प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.
चांगले नशीब? वाईट नशीब? आपण काय करू शकतो?
11 मी या आयुष्यात योग्य नसलेल्या आणखीही काही गोष्टी पाहिल्या. सगळ्यात जोराने धावणारा धावपटू शर्यत जिंकत नाही: सर्वशक्तीमान सैन्य नेहमीच लढाई जिंकते असे नाही. सर्वांत शहाण्या माणसाला त्याने कमावलेले अन्न नेहमीच खाता येते असे नाही. खूप हुशार असलेल्या माणसाला संपत्ती मिळते असे नाही आणि सुशिक्षित माणसाला त्याच्या योग्य अशी स्तुती नेहमी लाभत नाही. वेळ आली की त्या सर्वांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात.
12 पुढच्या क्षणी काय घडणार आहे ते माणसाला कळत नाही. तो जाळ्यात अडकलेल्या माश्यासारखा असतो. माशालाही काय घडणार आहे ते माहीत नसते. तो सापळ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्यालाही पुढे काय घडणार आहे ते माहीत नसते. त्याच प्रमाणे माणूसही अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतो.
शहाणपणाचे सामर्थ्य
13 मी या आयुष्यात शहाणपणाची गोष्ट करणारा माणूस पाहिला. आणि ते मला फार महत्वाचे वाटते. 14 थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द् लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले. 15 पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरुन गेले. 16 पण मी अजूनही म्हणेन की शहाणपण शक्तीपेक्षा चांगले आहे. ते लोक त्या गरीबाचे शहाणपण विसरून गेले. आणि तो जे काही म्हणाला त्याकडे लक्ष देणेही त्यांनी सोडून दिले. पण तरीही शहाणपण चांगले असते यावर माझा अजूनही विश्वास आहे.
17 विद्वान माणसाने शांतपणे उच्चारलेले काही शब्द
हे मूर्ख राजाने [b] ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.
18 शहाणपण हे युध्दा्तल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते.
पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करू शकतो.
शेवटची सूचना आणि सलाम
13 ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.” [a] 2 मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसऱ्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माझ्या परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसऱ्यांनाही नाही. 3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे. 4 कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू.
5 तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वतःची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. 6 आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. 7 आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे. 8 कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरेपणासाठी करता येते. 9 जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, ती अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे. 10 यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये.
11 शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
12 पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.
13 सर्व संत आपणांस सलाम सांगतात. 14 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center