Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
ईयोब 25-27

बिल्दद ईयोबला उत्तर देतो

25 नंतर शूहीच्या बिल्ददने ईयोबला उत्तर दिले:

“देव राजा आहे.
    प्रत्येकाने देवाला मान दिला पाहिजे आणि त्याचे भय बाळगले पाहिजे.
    देव त्याच्या स्वर्गीय राज्यात शांती राखतो.
कुठलाही माणूस त्याचे तारे [a] मोजू शकत नाही.
    देवाचा सूर्य सर्व लोकांवर उगवतो.
देवाशी तुलना करता कुठलाही माणूस चांगला नाही.
    कुठलाही मनुष्यप्राणी पवित्र असणार नाही.
देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही.
    देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
माणसे तर त्याच्या दृष्टीने पवित्रतेत खूपच कमी पडतात.
    मनुष्यप्राणी एखाद्या अळीप्रमाणे (मॅगॉट) आहे.
    तो कवडीमोलाच्या जंतूप्रमाणे आहे.”

ईयोब बिल्ददला उत्तर देतो

26 नंतर ईयोबाने बिल्ददला उत्तर दिले:

“बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात.
    हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले.
    (हे ईयोबाचे बोलणे उपरोधक आहे)
विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला.
    तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत.
हे बोलण्यासाठी तुम्हाला कुणाची मदत मिळाली?
    कुणाच्या आत्म्याने तुम्हांला याची प्रेरणा दिली?

“मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने
    पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.
परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो.
    मृत्यु देवापासून लपून राहात नाही.
देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले.
    देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो.
    परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही.
देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो.
    तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो.
10 देवाने सागरावर एक वर्तुळ आखले
    आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
11 देव जेव्हा धमकी देतो
    तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लागतो.
12 देवाची शक्ती सागराला शांत करते.
    देवाच्या विद्वत्तेने राहाबाच्या मदतनीसांना नष्ट केले.
13 देवाचा नि:श्वास आकाश स्वच्छ करतो.
    देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत.
    आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे.
    हे कोणालाच कळत नाही.”

27 नंतर ईयोब आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला:

“खरोखरच देव आहे.
आणि तो आहे हे जसे खरे आहे
    तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे.
होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
    परंतु जोपर्यंत माझ्यात जीव आहे
    आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत,
माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत
    आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही.
    मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.
मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन.
    चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही.
    मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
लोक माझ्याविरुध्द उभे राहिले.
    वाईट माणसांना जशी शिक्षा होते तशी माझ्या शत्रूंना व्हावी अशी मी आशा करतो.
जर एखादा माणूस देवाला मानत नसेल तर तो मेल्यावर त्याला कसलीच आशा राहाणार नाही.
    देव त्याचे आयुष्य संपवतो तेव्हा त्याला आशा करायला जागा नसते.
त्या दुष्ट माणसावर संकटे येतील
    आणि तो देवाच्या मदतीसाठी रडेल.
    पण देव त्याचे ऐकणार नाही.
10 त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता.
    त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.

11 “मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी सांगू शकेन.
    सर्वशक्तिमान देवाच्या योजना मी तुमच्या पासून लपवणार नाही.
12 तुम्ही देवाचे सामर्थ्य तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
    मग तुम्ही असे निरर्थक का बोलता?

13 “देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती.
    आणि सर्वशक्तिमान देवाकडून दुष्टांना हेच मिळाले होते.
14 दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील.
    दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
15 त्याची सर्व मुले मरतील
    आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.
16 दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल,
    त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17 परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील
    आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.
18 दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जास्त दिवस टिकणार नाही.
    ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदाराच्या तंबूप्रमाणे असेल.
19 दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल.
    परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
20 तो घाबरेल, महापुराने आणि वादळाने सर्वकाही वाहून न्यावे तसे होईल.
21 पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल.
    वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
22 दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील
    परंतु कसलीही दयामाया न दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
23 दुष्ट माणूस पळून गेला म्हणून लोक टाळ्या वाजवतील.
    तो आपल्या घरातून पळून जात असता लोक शिट्या मारतील.”

प्रेषितांचीं कृत्यें 12

हेरोद अग्रिप्पा ख्रिस्ती मंडळीला दुखावतो

12 त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला. हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली, याकोब हा योहानाचा भाऊ होता. हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे. म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.) हेरोदाने पेत्राला अटक करुन तुरुंगात टाकले. सोळा शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वल्हांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली. म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.

पेत्र तुरुंग सोडतो

पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”

मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टान्त पाहत आहोत. 10 पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोंचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.

11 पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.”

12 या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. 13 पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. 14 तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचेसुद्धा विसरुन गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे!” 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिज!”

16 पण पेत्र बाहेरुन दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.

18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. 19 हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली.

हेरोद अग्रिप्पाचे मरण

नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. 20 हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.

21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करु लागला. 22 लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.

24 देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.

25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरुशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center