Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
ईयोब 3-4

इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो

नंतर ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. तो म्हणाला,

“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो.
    ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली
    नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
तो दिवस काळाकुटृ झाला असता,
    देवाला त्याचे विस्मरण झाले असते,
    त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो.
    ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे.
    दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो.
    तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये.
    आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे.
    ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत.
    त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो.
    सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
10 का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही.
    ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
11 मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही?
    मी जन्मतःच का मेलो नाही?
12 माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले?
    तिने मला स्तनपान का दिले?
13 मी जर जन्मतःच मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो.
    पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो
आणि विश्रांती घेतली असती तर किती बरे झाले असते.
14     त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली
    परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
15 ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली
    त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
16 मी जन्मतःच मेलेले
    आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही?
दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले
    मूल मी असतो तर बरे झाले असते.
17 वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात.
    आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
18 थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो.
    तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
19 थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात,
    गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.

20 “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे?
    ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
21 ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही,
    दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
22 ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील.
    आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
23 परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो
    आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
24 जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही!
    माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
25 काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती आणि तेच घडले.
    जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
26 मी शांत होऊ शकत नाही.
    मी स्वस्थ राहू शकत नाही.
मी विसावा घेऊ शकत नाही.
    मी अतिशय अस्वस्थ आहे.”

अलीफज म्हणतो:

तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:

“मी काहीतरी बोललेच पाहिजे.
    मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?
ईयोब, तू खूप लोकांना शिकवलं आहेस.
    अशक्त हातांना तू शक्ती दिली आहेस.
खाली पडणाऱ्या लोकांना तू तुझ्या शब्दांनी सावरले आहेस.
    ज्यांच्यात स्वतःहून उभे राहण्याचे बळ नव्हते त्यांना तू सबळ केले आहेस.
पण आता तुझ्यावर संकटे आली
    असताना तू खचला आहेस.
संकटे कोसळल्यावर
    तू कष्टी झाला आहेस.
तू देवाची भक्ती करतोस.
    तुझा त्याच्यावर विश्वास आहे.
तू चांगला माणूस आहेस
    आणि तीच तुझी आशा असू दे.
ईयोब, तू याचा विचार कर, निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही.
    चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही.
मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत,
    पण अशा लोकांना नेहमी शासन होते.
असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात.
    देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.
10 वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात.
    परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो.
11 हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात.
    ते मरतात आणि त्यांची मुले इतस्ततः भटकत राहातात.

12 “माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला
    आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
13 त्यामुळे एखाद्या भयंकर स्वप्नाने झोप चाळवावी
    तशी माझी झोप चाळवली गेली.
14 मी घाबरलो. माझा थरकाप झाला.
    माझी सगळी हाडे थरथर कापू लागली.
15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला
    आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले.
16 तो आत्मा निश्र्चल उभा राहिला
    पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही.
माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता
    आणि सर्वत्र शांतता होती.
    आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
17 ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही.
    माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
18 हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही.
    त्याला स्वतःच्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात.
19 तेव्हा माणसे नक्कीच वाईट आहेत.
    ते मातीच्या घरात राहातात (म्हणजे त्यांचे शरीर नाशवंत आहे) आणि या मातीच्या घरांचा पाया मातीतच असतो.
    ते पतंगापेक्षाही (किड्यापेक्षाही) अधिक सहजतेने चिरडले जातात.
20 माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरत असतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही.
    ते मरतात आणि कधीच परत न येण्यासाठी निघून जातात.
21 त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जातात [a]
    आणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’”

प्रेषितांचीं कृत्यें 7:44-60

44 “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. 45 नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला. 46 दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने, याकोबाच्या देवासाठी मंदीर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. 47 परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले.

48 “कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितातः

49 ‘प्रभु म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे.
    पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
तुम्ही माइयासाठी कसले घर बांधू शकता?
    मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही.
50 माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’” (A)

51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

स्तेफनाचा वध होतो

54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”

57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center