Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उपदेशक 4-6

मरणे सगळ्यात चांगले आहे का?

खूप लोकांना वाईट वागणूक दिली गेल्याचे मी पुन्हा पाहिले. आणि या दु:खी लोकांचे सांत्वन करायला कुणीही नाही. हे ही मी पाहिले. दुष्ट लोकांकडेच सर्व सत्ता असते. हे मी पाहिले. आणि ते ज्या लोकांना दु:ख देतात त्यांचे सांत्वन करायलाही कुणी नसते, हे ही मी पाहिले. जे लोक जिवंत आहेत त्यांच्यापेक्षा मेलेल्या लोकांची अवस्था चांगली आहे असे मला वाटते. आणि जे लोक जन्मतःच मरतात त्यांच्यासाठी तर सर्व खूपच चांगले आहे. का? कारण या जगात जी वाईट कृत्ये केली जातात ती त्यांनी कधी पाहिली नाहीत.

इतके कष्ट का करायचे?

नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

काही लोक म्हणतात, “हाताची घडी घालून स्वस्थ बसणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर काम केले नाही तर उपाशीपोटी मराल.” कदाचित ते सत्य असेल. पण मी म्हणतो की तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.

ज्या गोष्टीचा अर्थ लागत नाही असे काही तरी मी पुन्हा पाहिले; एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वतःला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.

मित्र आणि कुटुंबीय शक्ती देतात

एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.

10 जर एखादा माणूस पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण जर माणूस एकटा असताना पडला तर ते वाईट असते. त्याला मदत करायला तिथे कुणीही नसते.

11 जर दोन माणसे एकत्र झोपली तर त्यांना ऊब मिळेल. पण जो माणूस एकटाच झोपतो त्याला उबदार वाटणार नाही. त्याला ऊब मिळणार नाही.

12 शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर अधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.

लोक, राजकारण आणि लोकप्रियता

13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही. 14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुंरूगातून राज्य करायला आला असेल. 15 पण मी आयुष्यात लोकांना बघितले आहे आणि मला हे माहीत आहे. लोक त्या तरुणाचेच ऐकतील. तोच नवीन राजा बनेल. 16 खूप लोक त्या तरुणाच्या मागे जातील. पण नंतर त्या लोकांना तो आवडेनासा होईल. हाही अविचारच आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

शब्द देण्याआधी काळजी घ्या

देवाची उपासना करायला जाताना काळजी घ्या. मूर्ख लोकांप्रमाणे यज्ञ करण्यापेक्षा देवाचे ऐकणे चांगले आहे. मूर्ख लोक बरेचदा वाईट गोष्टी करतात आणि ते त्यांना कळत देखील नाही. देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पृथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:

खूप काळजी केल्यामुळे वाईट स्वप्ने पडतात
    आणि मूर्खाकडून खूप शब्द बोलले जातात.

जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या. कसलेच वचन न देणे हे काही तरी वचन देऊन त्याची पूर्तता न करण्यापेक्षा चांगले असते. म्हणून तुमच्या शब्दामुळे स्वतःला पाप करायला लावू नका. “मी जे बोललो ते मला बोलायचे नव्हते.” असे याजकाला म्हणू नका. तुम्ही जर असे केलेत तर देव तुमच्या शब्दांवर खरोखरच रागावेल आणि तुम्ही ज्याच्यासाठी कष्ट केलेत त्या सर्वाचा नाश करील. तुमची निरर्थक स्वप्ने आणि पोकळ बडबड तुम्हाला संकटात लोटणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही देवाला मान द्यायला हवा.

प्रत्येक राजावर एक राजा असतो

काही देशांत गरीब लोकांवर खूप कष्ट करायची सक्ती केली जाते. गरीबांच्या बाबतीत हे अन्यायकारक आहे हे तुम्ही जाणता. हे गरीबांच्या हक्काविरुध्द आहे. पण आश्चर्य वाटून घेऊ नका. जो राजा त्यांना हे करायला भाग पाडतो त्याला भाग पाडणारा ही एक राजा आहे. आणि या दोघांना भाग पाडायला लावणारा आणखी एक राजा आहे. राजाही गुलाम आहे-त्याचा देशच त्याचा मालक आहे. [a]

संपत्ती सुख विकत घेऊ शकत नाही

10 जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्ती बद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हा ही अविचार आहे.

11 एखाद्याकडे जास्त संपत्ती असेल तर ती खर्च करण्यासाठी त्याला मित्रांची आवश्यकता असते. त्यामुळे श्रीमंत माणसाला काहीच लाभ होत नाही. तो फक्त त्याच्या संपत्ती कडे पाहू शकतो.

12 जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही.

13 मी या आयुष्यात एक अतिशय वाईट गोष्ट घडलेली पाहिली. माणूस भविष्यासाठी पैसे साठवतो. 14 पण काही तरी वाईट घडते आणि त्याची संपत्ती जाते. त्यामुळे त्याच्या मुलाला द्यायला त्याच्याजवळ काहीही राहात नाही.

15 माणूस त्याच्या आईच्या उदरातून जगात येतो तेव्हा काहीही न घेता येतो. आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हाही तो त्याच प्रकारे जातो. काहीही न घेता. तो गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो बरोबर काहीही नेत नाही. तो ज्या रीतीने जगात येतो त्याच रीतीने जातो. 16 हे फारच वाईट आहे म्हणून “वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यात माणसाला काय मिळते?” 17 त्याला फक्त दुःखाने आणि खिन्नतेने भरलेले दिवस मिळतात. आणि शेवटी तो निराश, आजारी आणि रागीट बनतो.

आयुष्यातील काम आनंदाने करा

18 मी पाहिले आहे की, माणूस करू शकेल अशी चांगली गोष्ट पुढीलप्रमाणे आहे: माणसाने पृथ्वीवरील त्याच्या लहानशा आयुष्यात खावे. प्यावे आणि काम करण्यात आनंद मिळवावा. देवाने त्याला काही दिवसांचेच आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच त्याच्याजवळ आहे.

19 जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे. 20 माणसाला जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्याला त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.

संपत्ती सुख आणीत नाही

मी या आयुष्यात आणखी एक गोष्ट बघितली आहे. जी योग्य नाही. ती समजायला फार कठीण आहे: देव माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानमरातब देतो, त्या माणसाजवळ त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्याला जे जे हवे ते सर्व असते. परंतु देव त्याला या सगळ्याचा उपभोग घेऊ देत नाही. कोणीतरी अनोळखी येतो आणि सारे काही घेऊन जातो. ही अतिशय वाईट आणि निरर्थक गोष्ट आहे.

एखादा माणूस खूप वर्षे जगेल आणि कदाचित त्याला 100 मुले असतील. परंतु जर तो माणूस चांगल्या गोष्टीत समाधानी नसला आणि तो मेल्यावर त्याची कोणाला आठवणही आली नाही तर जन्मतःच मेलेले मूल त्या माणसापेक्षा खूप बरे आहे असे मला वाटते. मूल मेलेले निपजणे ही अतिशय निरर्थक गोष्ट आहे. ते मूल लगेच निनावीच एका काळोख्या कबरेत पुरले जाते. त्या मुलाला कधीही सूर्यदर्शन होत नाही. त्या मुलाला कधीही काहीही माहीत होत नाही. अशा मुलाला आयुष्यात देवाने दिलेल्या गोष्टींचा उपभोग घेऊ न शकणाऱ्या माणसापेक्षा अधिक विसावा मिळतो. तो माणूस कदाचित 2,000 वर्षे जगेल. पण त्याने जर आयुष्याचा उपभोग घेतला नाही तर जन्मतःच मेलेल्या मुलाने त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग [b] शोधला असे म्हणावे लागते.

माणूस खूप कष्ट करतो. का? स्वतःचे पोट भरण्यासाठी. पण तो कधीही समाधानी असत नाही. याच रीतीने शहाणा माणूस मूर्खा पेक्षा अधिक चांगला नसतो. गरीब राहून आयुष्य जसे सामोरे येते तसा त्याचा स्वीकार करणे हे अधिक चांगले. आपल्याजवळ जे आहे. त्यात समाधान मानणे हे अधिकाची हाव धरण्यापेक्षा बरे आहे. कारण अधिकाची हाव धरणे निरर्थक आहे. ते अधिक वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. [c]

10-11 माणूस, म्हणजे ज्यासाठी त्याला निर्माण केले गेले तो एक माणूस आणि त्याबद्दल वाद करणे निरर्थक आहे. माणूस या विषयी देवाजवळ वाद घालू शकत नाही. का? कारण देव माणसापेक्षा शक्तिशाली आहे. आणि खूप वेळ वाद घातला तरी त्यात बदल होणार नाही.

12 माणसाच्या छोट्याश्या आयुष्यात त्याच्यासाठी पृथ्वीवर काय चांगले आहे ते कोणाला कळणार? त्याचे आयुष्य सावलीप्रमाणे सरकते. पुढे काय घडणार आहे ते त्याला कोणीही सांगू शकणार नाही.

2 करिंथकरांस 12

पौलाच्या जीवनातील खास आशीर्वाद

12 मी प्रौढी मिरविलीच पाहिजे. जरी त्यापासून कोणताही लाभ नाही. मी आता प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण याकडे वळतो ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो. आणि मला माहीत आहे, हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही पण देव जाणतो. तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही. मी अशा माणसाविषयी प्रौढी बाळगीन. परंतु माझ्या अशक्तपणाशिवाय मी स्वतःविषयी अभिमान बाळगणार नाही.

जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वतःला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माझ्यापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये.

आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला. तीन वेळा मी प्रभूला विनंति केली की, तो माझ्यातून काढून टाक. पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे. 10 या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो. अपमानात, कठीण परिस्थितित, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हा मी सशक्त असतो.

करिंथ येथील ख्रिस्ती लोकांविषयी पौलाचे प्रेम

11 मी स्वतःच मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो. 12 प्रेषितांची चिन्हे ही आहेतः चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली. 13 कारण मी तुम्हांला भार झालो नाही, ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळ्यापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशात उणे आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा.

14 पाहा, आता तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते. 15 म्हणून मी फार आनंदाने माझ्याकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वतःदेखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?

16 तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा. 17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हांपासून काही फायदा घेतला आहे का? 18 मी तीताला तुमच्याकडे जाण्यास विनंति केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले. तीताने तुम्हांपासून काही फायदा करुन घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय?

19 तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत. आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हांला बळकट करण्यासाठी. 20 कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील. 21 म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center