Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
एस्तेर 1-2

राणी वश्तीचा आज्ञाभंग

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता. शूशन या राजधानीच्या नगरातून राजा अहश्वेरोश राज्य करीत असे.

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते. या मेजवान्या एकशेऐंशी दिवस चालल्या. या काळात राजा अहश्वेरोशने आपल्या राज्याच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले. आपल्या प्रासादाचे राजेशाही सौंदर्य आणि वैभव त्याने सर्वांना दाखवले. एकशेऐंशी दिवसांचा हा काळ संपल्यावर राजा अहश्वेरोशने आणखी एक मेजवानी दिली. ती सात दिवस चालली. राजवाडयाच्या अंतर्भागातील उद्यानात ही मेजवानी होती. तिथे शूशन या राजधानीच्या शहरातील समस्त लहान थोरांना आमंत्रित केले होते. या आतल्या उद्यानात अळशीच्या सुताचे पांढरे निळे शोभेचे पडदे खोलीभर टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया अळशीच्या दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभांना लावले होते. तेथील मंचक सोन्यारुपाचे असून जांभा, संगमरवर शिंप आणि इतर मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवलेले होते. सुवर्णपात्रांतून द्राक्षारस दिला होता. ही पात्रेही नानाविविध तऱ्हांची होती. राजा अतिशय उदार असल्यामुळे द्राक्षारस भरभरुन देण्यात आला. सर्व आमंत्रितांना मनसोक्त द्राक्षारस देण्यात यावा अशी राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती व सेवक राजाची आज्ञा पाळत होते.

राणी वश्ती हिनेही राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

10-11 मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मनः स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.

12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला. 13-14 पंडिताचा आणि ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. त्यानुसार कायदे जाणणाऱ्या पंडितांशी राजा बोलला. ही सुज्ञ मंडळी राजाला जवळची होती. त्यांची नावे अशी: कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. 15 राजा ने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी कारण तिने राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तीचे उल्लंघन केले आहे.”

16 तेव्हा ममुखानाने सर्व अधिकाऱ्यांसमक्ष राजाला सांगितले, “राणी वश्तीच्या हातून प्रमाद घडलेला आहे. तिची ही गैरवर्तणूक केवळ राजाच्याच विरुध्द नव्हे तर राज्यातील सर्व सरदार व प्रजा यांच्याविरुध्द आहे. 17 माझे म्हणणे असे आहे की राणी वश्ती अशी वागली हे इतर सर्व बायकांना समजेल. त्या उद्या आपल्या नवऱ्यांचा शब्द डावलतील. त्या आपापल्या नवऱ्यांना म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणायला सांगितले पण तिने यायला नकार दिला.’

18 “राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे. त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल. त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप फैलावेल.

19 “तर राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो. राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कुणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. 20 राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व बायका आपापल्या नवऱ्यांशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या बायका आपल्या नवऱ्याचा मान ठेवतील.”

21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली. 22 राजा अहश्वेरोशने सर्व राज्यभर खलिते पाठवले. प्रत्येक प्रांतात पाठवायचा खलिता त्या प्रांताच्या भाषेत होता. प्रत्येक राष्ट्राला तिथल्या भाषेत पत्र गेले. प्रत्येक पुरुषाची आपल्या घरात सत्ता चालावी असे त्या पत्रांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते.

एस्तेरला राणीपद मिळते

काही काळानंतर राजा अहश्वेरोशचा राग शमला. त्याला वश्तीची आणि तिच्या वागण्याची आठवण झाली. तिच्याविषयी आपण दिलेल्या आज्ञा आठवल्या. तेव्हा राजाच्या व्यक्तिगत सेवेतील सेवकांनी सुचवले, “राजासाठी तरुण, सुंदर कुमारीकांचा शोध घ्यावा. आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी निवडावा. त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख, सुकुमार कुमारीकांना शूशन या राजधानीत घेऊन यावे. त्यांना अंतःपुरात ठेवावे. तेथे अंतःपुराचा प्रमुख व हेगे या खोजाच्या निगराणीखाली त्यांना ठेवावे. त्याने त्यांना तेल आणि सुगंधित द्रव्य देऊन त्यांच्यावर सौंदर्य उपचार करावेत. त्यांच्यामधून मग जी मुलगी राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या ऐवजी राणीपद मिळावे.” राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.

यावेळी बन्यामीनच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहुदी शूशन या राजधानीच्या शहरात होता. मर्दखय हा याईरचा मुलगा आणि याईर शिमईचा मुलगा आणि शिमई कीशचा मुलगा होता. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहुदाचा राजा यखन्या याचा पाडाव करून त्याला यरुशलेमेहून नेले तेव्हा त्या लोकांमध्ये मर्दखय होता. त्याला हदस्सा नावाची एक चुलत बहीण होती. तिला आईवडील नसल्यामुळे मर्दखयनेच तिचा सांभाळ केला होता. तिचे आईवडील वारलें तेव्हा मर्दखयने तिला आपली मुलगी मानून तिला वाढवले. हदस्सालाच एस्तेर म्हणत. ती अतिशय रुपवती आणि सुरेख होती.

राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर पुष्कळ मुलींना राजधानी शूशन येथे आणले गेले. त्यांना हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. एस्तेरलाही राजवाड्यात हेगेकडे सोपवले गेले. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. हेगेला एस्तेर आवडली. तिच्यावर त्याची मर्जी बसली. त्यामुळे त्याने तिला ताबडतोब सौंदर्योपचार आणि खास आहार दिला. राजवाड्यातील सात दासींची हेगेने निवड केली आणि एस्तेरच्या दिमतीला त्यांना नेमले. एस्तेरला आणि त्या सात दासींना त्याने अंतःपुरातील सगळ्यात चांगल्या जागी हलवले. 10 आपण यहुदी आहोत हे एस्तेरने कुणालाही सांगितले नव्हते. मर्दखयने बजावल्यामुळे तिने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कोणालाही सांगितली नव्हती. 11 एस्तेरची खबरबात जाणून घेण्यासाठी मर्दखय रोज अंतःपुराच्या अवतीभवती फेऱ्या घाली.

12 राजा अहश्वेरोशकडे जाण्याची पाळी येण्यापूर्वी प्रत्येक मुलीला पुढील सोपस्कारातून जावे लागे. तिला बारा महिने सौदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे व सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत. 13 आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती: अंतःपुरातील जी गोष्ट हवी ती तिला मिळत असे. 14 संध्याकाळी ती राजाकडे जाई. सकाळी ती दुसऱ्या अंतःपूरात परत येत असे. तिथे शाशगज नांवाच्या खोजाकडे तिला हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्न्यांची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी मुलगी पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलवे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.

15 एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा तिने काहीही मागून घेतले नाही. राजाच्या अंतःपुराचा प्रमुख खोजा हेगे याने जे सुचवले ते पाळण्याची तिची इच्छा होती. (मर्दखयचा काका अबीहइल याची ती मुलगी. मर्दखयने तिला आपली मुलगी मानली होती) ज्या कोणी एस्तेरला पाहीली त्यांना ती आवडली. 16 तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.

17 इतर सर्व मुलींपेक्षा राजाला एस्तेर आवडली. तिच्यावर त्याचा लोभ जडला. इतर सर्व कुमारींहून त्याला ती पसंत पडली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट चढवून वश्तीच्या जागी तिला राणी केले. 18 आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना त्याने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने सुट्टी जाहीर केली. आपल्या उदारत्वामुळे त्याने लोकांना बक्षीसे दिली.

मर्दखयला कटाचा सुगावा लागतो

19 सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. 20 एस्तेरने आपण यहुदी असल्याचे अजूनही गुपित ठेवले होते. आपली कौंटुबिक पार्श्वभूमी तिने कोणाला कळू दिली नव्हती. मर्दखयनेच तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.

21 मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारा वरील राजाचे पहारेकरी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले. 22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. 23 मग या बातमीचा तपास करण्यात आला. मर्दखयची खबर खरी असल्याचे आढळून आले. ज्या पहारेकऱ्यांनी राजाच्या खुनाचा कट केला होता त्यांना फाशी देण्यात आली. या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 5:1-21

हनन्या आणि सप्पीरा

हनन्या नावाचा एक मनुष्य होता त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले, त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमति दिली होती.

पेत्र म्हणाला, “हनन्या, तू तुइया अंतःकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”

5-6 जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.

सुमारे तीन तासांनंतर त्याची पत्नी आत आली, सप्पीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हांला किती पैसे मिळाले, (अमुक) इतक्याच पैशांना मिळाले काय?”

सप्पीरास उत्तर दिले, “होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.”

पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.” 10 त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. 11 सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले.

देवाचे पुरावे

12 प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. 13 आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत. परंतु सर्व प्रेषितांची स्तुति करीत; 14 आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. 15 त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. 16 लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले, आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली.

यहूदी प्रेषितांना मना करण्याचा प्रयत्न करतात

17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला. 18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. 19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, 20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.” 21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले.

त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center