Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 33

याकोब आपले शौर्य दाखवितो

33 याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते. याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले.

याकोब स्वतः एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले.

एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहुंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळयात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”

याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”

मग याकोबाच्या दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे गेल्या आणि त्यांनी एसावाला लवून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ, एसावापुढे गेली आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.

एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”

याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”

परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.”

10 याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो; 11 म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला.

12 मग एसाव म्हणाला, “आता तू वाटेस लाग व तुझा प्रवास पुढे चालू ठेव; मीही तुझ्याबरोबर चालतो.”

13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील; 14 तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”

15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवितो;”

परंतु याकोब म्हणाला, “ही तर माझ्या स्वामीची माझ्यावर कृपा आहे; परंतु माणसे ठेवण्याची तशी गरज नाही.” 16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. 17 याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.

18 याकोबाने पदन आरामपासून सुरु केलेला प्रवास कनान देशातील शखेमला सुखरुपपणे संपवला व त्या नगराजवळील एका शेतात आपला तळ दिला. 19 ते शेत त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजाकडून शंभर कसिटा (चांदीची नाणी) देऊन विकत घेतले;

20 देवाची उपासना करण्यासाठी त्याने तेथे एक वेदी बांधली. त्याने त्या ठिकाणाचे नाव “एल, इस्राएलाचा देव ठेवले.”

मार्क 4

बी पेरणाऱ्या शेतकऱ्याविषयीची बोधकथा(A)

दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते. त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,

“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला. तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले. दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”

मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”

येशू बोधकथांचा उपयोग का करतो हे सांगतो(B)

10 जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.

11 तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे. 12 यासाठी की,

‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही
    ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही
जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले
    तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.’” (C)

बियांविषयीच्या बोधकथेचे येशू स्पष्टीकरण करतो(D)

13 मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल? 14 पेरणारा वचन पेरतो. 15 काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.

16 “काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात. 17 पण त्यांनी ते वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.

18 “इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात. 19 परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.

20 “आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”

तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग केलाच पाहिजे(E)

21 आणखी तो त्यांस म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवठणीवर ठेवण्यासाठी आणीत नाहीत काय? 22 प्रत्येक गोष्ट जी झाकलेली आहे ती उघड होईल. आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. 23 ज्याला कान आहेत ते ऐको! 24 नंतर तो त्यास म्हणाला, तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात येईल. किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल. 25 कारण ज्याच्याजवळ आहे त्याला जास्त दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”

येशू बियांच्या बोधकथेचा उपयोग करतो

26 आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो. 27 रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही. 28 जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्यांनी भरलेले ओंबी, मग कणसात पूर्ण वाढलेला दाणा. 29 पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”

देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे(F)

30 येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी? 31 ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो. 32 परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”

33 अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला. 34 बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही, परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले.

येशू वादळ शांत करतो(G)

35 त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवरापलीकडे जाऊ या.” 36 मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो नावेत होता तसेच त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसऱ्या नावा होत्या. 37 जोराच्या वाऱ्याचे वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली. 38 परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशी घेऊन झोपला होता. त्यांनी त्याला उठविले आणि म्हटले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?”

39 मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.

40 मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही कसा विश्वास नाही?”

41 परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”

एस्तेर 9-10

यहूद्यांचा विजय

बाराव्या (अदार) महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांना राजाच्या आज्ञेचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यादिवशी यहुद्यांचा पाडाव करण्याचे योजले होते. पण आता परिस्थिती बदलली होती. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते. आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी एकत्र आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द जायची कोणामध्येच ताकद नव्हती. यहुद्यांना ते लोक घारबले. शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहुद्यांना साहाय्य केले. कारण ते सगळे मर्दखयला घाबरत होते. मर्दखय राजवाड्यातील अतिमहत्वाची व्यक्ती झाला होता. त्याचे नांव राज्यातील सर्वापर्यंत पोचले होते आणि ते सगळे त्याचे महत्व जाणून होते. मर्दखयचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा त्यांनी मनःपूत समाचार घेतला. शूशन या राजाधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला. शिवाय त्यांनी पुढील लोकांना ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन अस्पाथा, पोराथा, अदल्या, अरीदाथा, पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा, 10 हे हामानचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा मुलगा हामान यहुद्यांचा शत्रूं होता. यहुद्यांनी या सर्वाना ठार केले खरे पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.

11 राजधानी शूशनमध्ये, त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाच्या कानावर आले. 12 तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानच्या दहा मुलांसकट यहुद्यांनी शूशनमध्ये 500 लोकांना मारले. आता राज्याच्या इतर प्रांतांत काय व्हावे अशी तुझी इच्छा आहे? मला सांग म्हणजे मी तसे करवून घेईन. माग म्हणजे मी तसे करीन.”

13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहुद्यांना आजच्यासारखेच उद्या करु दे. हामानच्या दहा मुलांचे देहही स्तंभावर टांगा.”

14 तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानच्या दहा मुलांना टांगले गेले. 15 अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहुदी एकत्र जमले. त्यांनी शूशनमधल्या 300 जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.

16 त्याच वेळी प्रांतांमधले यहुदीदेखील एकत्र जमले. आपल्या संरक्षणासाठी आपले सामर्थ्य वाढावे म्हणून ते जमले. मग त्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला. शत्रुपक्षांपैकी 75,000 जणांना त्यांनी ठार केले पण त्यांच्या मालमत्तेमधले काही घेतले नाही. 17 अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली. तो दिवस त्यांनी आनंदोत्सवात घालवला.

पुरीमचा उत्सव

18 शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस हा त्यांचा आनंदोत्सवाचा होता. 19 म्हणून गावोगावी आणि खेडोपाडी राहणारे यहुदी अदारच्या चतुर्दशीला पुरीम साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्या दिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.

20 मर्दखयने जे जे झाले ते सगळे लिहून काढले. मग त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळदूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठवली. 21 दरवर्षी अदार महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी यहुद्यांना पुरीम साजरा करायला सांगायला त्याने ती पत्रे लिहिली. 22 या दिवशी यहुद्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.

23 मर्दखयने त्यांना लिहिल्याप्रमाणे करायला यहूदी तयार झाले. हा उत्सव पुढेही चालू ठेवायला त्यांनी मान्य केले.

24 हम्मदाथाचा मुलगा अगागी हामान सर्व यहुद्यांचा शत्रू होता. त्याने यहुद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहुद्यांच्या संहारासाठी त्यांने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. 25 हामानने असे केले पण एस्तेर राजाशी बोलायला गेली. त्यामुळे त्याने नवीन आज्ञा दिल्या त्या आज्ञांमुळे हामानचे कारस्थान फसले एवढेच नव्हे तर हामान आणि त्याचे कुटुंब यांच्यावर त्यामुळे अरिष्ट कोसळले. त्यामुळे हामान आणि त्याचे पुत्र यांना फाशीच्या स्तंभांवर टांगण्यात आले.

26-27 त्याकाळी चिठ्ठयांना “पुरीम” म्हणत, म्हणून या दिवसाला “पुरीम” नाव पडले. मर्दखयने पत्र लिहून यहुद्यांना हा दिवस साजरा करायला सांगितले. त्यामुळे यहुद्यांनी दरवर्षी हे दोन दिवस सणासारखे साजरे करायची प्रथा सुरु केली. आपल्यावर काय ओढवले होते त्याची आठवण राहावी म्हणून त्यांनी तसे ठरवले. यहुदी आणि त्यांच्याबरोबरचे लोक दरवर्षी हे दोन दिवस न चुकता साजरे करतात. 28 प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसांची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व खेड्यापाड्यांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.

29 मग अबीहईलची मुलगी राणी एस्तेर आणि यहुदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. 30 राजा अहश्वेरोशच्या राज्यातील 127 प्रांतांमधील समस्त यहुद्यांना मर्दखयने पत्रे लिहिली. या सणाने शांतता निर्माण व्हावी आणि लोकांमध्ये परस्पर विश्वास असावा हा सणाचा उद्देश असल्याचे मर्दखयने लोकांना सांगितले. 31 पुरीम साजरा करायला लोकांना सांगण्यासाठी मर्दखयने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहुदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहुद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहुद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसांचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. 32 पुरीमचे नियम एस्तेरच्या पत्राने मुक्रर झाले. आणि या गोष्टींची लेखी नोंद पुस्तकात झाली.

मर्दखयचा सन्मान

10 राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले. आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले. राजा अहश्वेरोशच्या खालोखाल यहुदी मर्दखयचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. मर्दखयमुळे सर्व यहुद्यांना शांतता लाभली.

रोमकरांस 4

अब्राहामाचे उदाहरण

तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”

जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;

“ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
    ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
    तो धन्य!
धन्य तो पुरुष
    ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (A)

तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.

विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन

13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.

16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [a] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.

18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [b] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center